Sunday, December 13, 2009

महर्षिनगर

आताच्या भेटीनंतर जाणवले की महर्षिनगर पार बदलून गेले अाहे. आणि आता तर माझ्यासाठी तर ते पार बदलून जाईल. मधुमंगेश मधील आमचं घर आता राहणार नाही. त्याजागी नवी वास्तू होईल.

बदल हे मानवी जीवनाचे लक्षण आहे. पण इतक्या कमी काळात एवढा मोठा बदल, इतक्या सहजपणे होतो हे पाहून आश्चर्य वाटत राहते.

माझे वडील, शेजारचे काका ह्यांच्याकडून महर्षिनगरचा इतिहास ऐकला होता, पण त्याआधीचा इतिहास माझ्या साडूच्या, किरणच्या वडीलांकडून ऐकला. ते १९६५ पासून तेथे राहत आहेत.

महर्षिनगर निर्माण झाले ते पूरग्रस्तांच्या वसाहतीसाठी, १९६२ नंतर! त्याआधी तेथे काय होतं हे मला माहीत नाही. पण तो वेगळा संशोधनाचा विषय आहे.

किरणचे वडील आले तेंव्हा चाळींच्या दक्षीणेला काहीही नव्हते.... ना मधुमंगेश ना गीतगोविन्द ना ज्योत्स्ना! डोणवाडांचा बङगला ६२/६३ ला बनला आणि त्याचवेळी चाळी! त्यावेळी आजच्या शिवाजी पुतळा- काळूबाई मन्दीरापासून ते झाला कॉम्प्लेक्स पर्यन्त जंगल होते. तेथे कंजारभाट लोकांच्या दारूच्या भट्ट्या होत्या. तेथे पोलीसही जायला घाबरत. सरदार पानश्यांच्या जागेत मधूमंगेश होऊ लागली, त्याचसुमारास मार्केटयार्डाची स्थापना झाली; तेंव्हा मग शासनाने मोठा फौजफाटा पाठवून त्या भट्ट्या बंद केल्या.


आम्ही मधुमंगेश सोसायटीमध्ये रहायला आलो तेंव्हा सगळ्याच बंगल्यांमध्ये लोक रहायला आले नव्हते. शिवाय गोवर्धनमधील ४ ते ५ प्लॉट रिकामे होते. लालबाग सोसायटी नसल्यामुळे फाटकांच्या आवारातून मार्केटयार्डाची वाहने दिसायची. तेथील विहीरीचे आकर्षण होतेच, शिवाय पळनीटकरांच्या बाजूने ओढयाला प्रवेश होता. लालबागच्या विहीरीत आणि ऒढ्यात विविध प्रकारचे मासे होते, आम्ही ते पकडायला जायचो. मला कधीच जमले नाही, पण एकाने काकडी एवढा जाड मासा पकडलेला मला आठवतोय. खेकडे होते, पण सगऴ्यात जास्त खेकडे महाराष्ट्र मंडळ शाळेच्या मागे कॅनॉलमध्ये होते. तेथे मी ताटाएवढा खेकडा पकडलेला पाहीला होता.

मधुमंगेश आणि गोवर्धनमध्ये सगळ्या मोकळ्या जागेत भरपूर गवत यायचे. सापांची वारूळे होती. आमच्या घरात आलेले ३ ते ४ साप मारलेले आठवत आहेत. साप मारण्यात अतुलदादा आणि जगतापांचा बाळू हे प्रविण! ८४ ते ८५ साली आमच्या बागेत चिखलात जाडसर पट्टा आढळुन यायचा, तो अजगराचा आहे असे अनुमान काढले होते. खुप घबराटीचे दिवस होते, कोणीतरी सांगीतले होते की बैलाची शिंगे जाळली की अजगर जवळ येत नाही, म्हणून बैलबाजारातून शिंगे आणून घमेल्यात ठेऊन जाळायचो. त्याचा उपयोग झाला म्हणायचा, कारण तसे पट्टे नंतर कधीच दिसले नाहीत.

ज्योत्स्ना सोसायटीच्या मागे, आताच्या निसर्ग कार्यालयाच्या जागेत गुरांचा बाजार भरायचा, आठवड्यातून दोन वेळेला. माझे आजोबा शेतकरी असल्याने त्यांना गुरांची विशेष ओळख होती आणि मला ते घेऊन जायचे. खुप लहानपणीच मला देशी गाय- जरसी गाय, पंढरपूरी म्हैस- जाफराबादी म्हैस, खिलारी बैल, ह्यांची माहीती झाली. तेथे बैलांना नाल ठोकण्याचे काम चालायचे. पाय बांधून जमीनीवर आडवा पाडलेला बैल इतका भेदरलेला असायचा अाणि त्याचे डोळे बटाट्याएवढे व्हायचे.

एकदा मी तीथे एक सशांची जोडी विकायला आलेली पाहीली, त्यांचे लालचुटुक होळे पाहून मी हरखून गेलो होतो. "ससे फार घाण करतात " असा आमच्या एका नातलगांनी सगळ्यांचा समज करून दिला होता, त्यामुळे आमच्याकडे कधीही ससे आले नाहीत.

महर्षिनगरमध्ये पूर्वी रानटी ससे होते, पण मी कधी पाहील्याचे आठवत नाही. मुंगुसे मात्र खुप होती, अजूनही आहेत, मधुन मधुन दिसतात. कावळे, चिमण्या, घारी, पोपट, साळुंख्या, होले, पारवे, छोटे बुलबुल, मोठे बुलबुल, दयाळ, कोकीळ, वेडे राघू, भारद्वाज आणि वटवाघूळे हे पक्षी अजूनही दिसतात. ओढ्यावर खंड्या हमखास दिसायचा. आंब्यांच्या दिवसात पोपटांचा थवा झाडावर यायचा. किंबहुना दिवस पोपटांच्या किर्राटाने उजाडायचा. अर्धवट खाऊन आंबे टाकायचे, सीताफळं खायचे, पेरू खायचे, डाळींबं खायचे. सर्वात विचित्र म्णणजे सोनचाफ्याच्या बिया खायचे, किती कडू असतात त्या! त्यावेळी खुप राग यायचा, फळांची नासधूस करतात म्हणून, पण त्यांचा पण वाटा आहेच की!

दोन तीन वेऴा रानटी हुप्प्या माकडांची टोळी आली होती. त्यांनी खुप धुमाकुळ घातला होता, बाथरुमच्या काचा फोडल्या होत्या. गुजरांच्या गच्चीवर बसलेली माकडे आणी आरडा ओरड करत त्यांना हुसकाऊन लावण्याचा प्रयत्न करणारया नलीनी काकू अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहेत.

त्यावेळी गोवर्धनच्या मैदानाला कुंपण नव्हते. उन्हाळ्याच्या सुट्टीत तेथे आम्ही दिवसभर क्रिकेट खेळायचो आणि संध्याकाळी शाखेत जायचो. पावसाळ्यात सर्वत्र गवत वाढायचे. कॉंग्रेस गवत (आणि पक्ष ) ह्यांची ओळख तेंव्हाच झाली. त्या माजलेल्या गवतातून सापांची भिती मनात ठेऊन आम्ही फुलपाखरे पकडत हिंडायचो. फुलपाखरांना मनानेच काही नावं दिली होती. दुधी, पिवळं, लाईट्या, लक्ष्मण गीड्डा ही नावं उच्चारली की तत्काळ ती ती फुलपाखरं माझ्या डोळ्यासमोर येतात. लाईट्या हे फुलपाखरू हिरव्या पिवळ्या आणि काळ्या ठिपक्यांचे होते आणि अतिशय चंचल, मला ते कधीच पकडायला जमलं नाही. सर्वात सुंदर म्हणजे चतुर! त्यांना आम्ही हेलीकॉप्टरही म्हणत असू. त्यात काळे आणि लाल असे दोन प्रकार होते. त्यांचा अजून एक भाईबंद म्हणजे सुई ! चतुरासारखीच पण खुप नाजूक, उडण्याचा वेगही मंद! दहा पंधरा दिवसांचं आयुष्य असणारया अनेक किटकांचे आयुष्य मी अजुनच कमी केलं होतं!

संध्याकाळ झाली की वटवाघूळे वेडीवाकडी उडत, समोरच्या उंबराच्या झाडाची उंबरं खात आणि दिवसभर आमच्या नारळाच्या झाडाला उलटं टांगून घेत. एकदा मी नवी गलोल केली, आणि सहज म्हणून वटवाघळाला दगड मारला. तो इतका वर्मी बसला की ते खाली पडलं आणि माझ्यासमोर तडफडून मेलं. दोन अडीच फुट लांब पंख असलेलं ते असं वाघूळ निश्चल झालेलं पाहून मी परत कधी कोणत्या प्राण्याला मारलं नाही.


गलोलीची अजून एक आठवण म्हणजे मी एकदा उडत्या कावळ्याला नेम धरून दगड मारला, ट्रॅजेक्टरी जमून आली आणि कावळ्याचा वेग पाहता हे निश्चीत होतं की दगड कावळ्याला लागणारच! पण दगड साधारणत: दोन फुटावर असताना कावळ्याने आपला मार्ग बदलला आणि माझा दगड चुकवला. कावळ्याची हुषारी पाहून माझ्याकडून वाहवा निघून गेली.

पावसाळ्यात बेडूक दिसायचे. श्रावणात सर्वत्र बेडकाची पिल्ले इकडून तिकडे उड्या मारत फिरायची. पिल्लांना पकडून पावसाच्या पाण्यात सोडून त्यांचे पोहोणं पाहणे हा माझा आवडता उद्योग होता. पण अनेक पक्षी त्या पिल्लांवर यथेच्छ ताव मारायचे. त्याच सुमारास काही पक्ष्यांची घरटी गजबजलेली असायची. एकदा आमच्या गुलाबाच्या ताटव्यात एका बुलबुलाने घरटे केले होते, दुपारी शाळेतून आले की पिल्ले पहायला जाणे हा आमचा उद्योग होता. कोणी जवळ गेले की आई आली असे वाटून ती पिल्ले चोची उघडून आवाज करू लागत. मग ती पिल्ले मोठी झाली आणि इकडून तिकडे उडू लागली. एक पिल्लू उडून माझ्या काकूच्या पदरात पडल्याचे मला आठवत आहे.

आजच्या सङगम सोसायटीच्या जागेवर सङगम मेटल्सचा कारखाना होता. फर्नेस पेटली की कोळश्याचा वास आसमंतात पसरायचा, पांढरा धूर खुप लांबून दिसायचा आणि तांबड्याबुंड लोखंडावर मारले जाणारे घाव ऐकू यायचे. हे सगळं पहायला आम्ही कधी कधी जात असू. पुढे कधीतरी हा कारखाना बंद पडला आणि त्याजागी इमारती झाल्या.


महर्षिनगरचे रस्ते मोठे होते. चाळींचे दरवाजे मुख्य रस्त्यांपासून खुप आत होते. चाळींचे उभे आडवे विस्तारीकरण झाले नव्हते. संध्याकाळी महाराष्ट्र मंडळातून यायला उशीर झाला तर रस्त्यांवर शुकशुकाट व्हायचा. १४१ आणि १४२ ह्या बसेस सोडल्या तर बाकी कोणत्या बसेस नव्हत्या.

दुघकेंद्र श्रीपालचे आणि सान्यांचे विद्यापीठातील किराणा मालाचे दुकान सोडले तर दुसरे दुकान नव्हते. संध्याकाळी दुध मिळायला अवघड असायचे. शाळेत जाताना आई दळण आणायला टिमवीतील दुकानात जायची. आई आणि आजोबा महिन्याचा किराणा आणायला भवानी पेठेत जात. महर्षिनगर ही फक्त रहायची जागा होती आणि सर्व प्रकारच्या खरेदीसाठी लोक गावात जात.

आमच्या कॉलनीत शांताराम काकांची विजय सुपर सोडली तर सर्वजण सायकल किंवा बसने ऒफीसला जात. शाळेत पायी जात असू आणि टिव्ही पहायला शेजारयांकडे! १९८३ चा क्रिकेट वर्ल्डकप गाडगीळांकडे पाहिल्याचे मला आठवते आहे. गणपतीच्या काळात पटांगणावर मोठ्ठा पडदा लाऊन त्यावर हिंदी सिनेमे दाखवत. त्याबद्दल खुप आकर्षण असायचे.

ते महर्षिनगर आणि आजचे महर्षिनगर पाहिले तर मी खुप म्हातारा झाल्यासारके वाटते आहे. आजचे महर्षिनगर पूर्वि तसे होते, २५- ३० वर्षात एखादी वसाहत इतकी बदलली ह्यावर विश्वास बसणे अबघड जाते.

Thursday, January 29, 2009

तुझा धर्म कंचा?

परदेशात राह्ताना आपण अल्पसंख्यांक असल्याचा कधी कधी अनुभ्व येतो. बहुतांशी अमेरिकन सहिष्णू आणि तुमच्या मताचा (राजकिय, धार्मिक) आदर करणारे असतात. ह्याविषयांवर वाद टाळणारे असतात. तुम्हाला तुमची ओळख जपू देतात.
.....अपवाद ईव्हानजेलीकल नामक मूलतत्त्ववादी...... ते तुम्हाला कुठेही पकडून येशूचे थोरवी सांगतील, व त्याला न स्विकाराल्यास तुम्ही नरकात जाल असे बिनादिक्कत सांगतील....

पण अापल्याकडे, भारतात लहान मुलांना धार्मिक नेणीव ( identity) ओळख केंव्हा होते? मी आठवून पाहिले तर मला माझ्या आईवडिलांनी "आपण हिंदू आहोत" असे कधीही सांगीतल्याचे आठवत नाही. उलटपक्षी मी सात वर्षांचा असताना बोलताना माझी एक काकू मला म्हणाली की आपण हिंदू आहोत. मला ती संकल्पना खुप परकी वाटली. हिंदि बोलणारे म्हणजे हिंदू असे मला वाटले. आपण तर मराठी बोलतो, मग ही आपण हिंदू आहोत असे का म्हणते आहे? मधुराचा अनुभवही असाच अाहे.

माझी हिंदू नेणीव ही खुप उशीरा म्हणजे मी १३/१४ वर्षांचा असताना, मुख्यत: वाचनातून झाली. मधुराची अजुनही होत अाहे.

पण अमेरिकेत पालक मुलांची धार्मिक नेणीव ( identity) निर्माण करण्याचा मुद्दाम प्रयत्न करतात. संडे स्कुल, समर कॆम्प, मद्रासा अश्या उपक्रमातुन मुलांमधील धार्मिकता वाढीस लागते. त्यासंदर्भातील काही अनुभव......

तीन वर्षांपूर्वी शिकागो विमानतळावर विमानाची वाट पाहत होतो. रमजानचे दिवस होते. मी बेगल- कॊफी खात बसलो होतो. बाजूला बसलेला, भारतीय वाटणारा एक ८ ते १० वर्षांचा माझ्याकडे बराच वेळ निरखुन पाहत होता. काही वेळाने मनातील उत्सुकता न रोखता आल्यासारखा मला म्हणाला, " आर यू नॊट फ़ास्टींग? यु आर मुस्लीम राईट? "

मी थक्क झालो. काय बोलावे ते मला कळेना. एवढ्या लहान मुलाशी काय वाद घालणार? "मला भुक सहन होत नाहीये" असे काहीतरी म्हणालो अाणि त्याला टाळले.

दुसरा अनुभव मधुराचा अाहे. क्लिव्हलंडला असताना निधर्मी विचारांच्या ज्यू प्राध्यापकांकडे एका पार्टीला गेली होती. तिकडे बहुतांशी लोक ज्यू धर्मिय होती. मधुरा खुर्चीत बसुन जेवताना एक ८ वर्षांची मुलगी तिकडे अाली व म्हणाली, " अार यु ज्यू? " मधुरा गोंधळली, "नाही" असे म्हणाली.


धार्मिक नेणीव ( identity) तिव्र झाली की मग "आमच्यातील" व "त्यांच्यातील" ही जाणीव ही वाढू लागते.

मुलांमध्ये धार्मिकता असावी, पण धर्माभिमान नसावा. ह्याचा एक सुखद अनुभव नुकताच अाला. मागच्या अाठवड्यात दन्तवैद्याकडे गेलो होतो. डॉक्टरांनी बोलावण्याची वाट पाहत होतो. वेळ येईपर्यंत माझ्या अायफोनवर गाणी ऐकत बसलो. एक भारतीय दिसणारा ८- ९ वर्षांचा मुलगा माझ्या फोन कडे पाहत होता.
मला एकदम उसळुन म्हणाला, "तुला माहित अाहे का, ह्यावर तुला व्हिडीअो पण पाहता येतात?"

मी अाश्चर्याचा भाव अाणून म्हणालो, "नाही!"
मग त्याचा चेहरा खुलला. एखाद्या प्राध्यापकासारखा उभा राहून त्याने मला माझ्या अायफोनचे प्रात्यक्षीत दिले. त्याच्या वडिलांच्या फोनवर त्याने काय काय अप्लीकेशन टाकली अाहेत, अाणि कुठली अप्लीकेशन "कूल" अाहेत ह्याची जंत्री दिली.

"माझ्याकडे काही चित्रपट अाहेत, ते मी अायफोनवर पाहू शकतो का? "

"नक्कीच, पण त्यासाठी तुला लॅपटॉप अाणि एक वायर लागेल, अाहे का तुझ्याकडे अाहे ?" त्याने लगेच उत्तर दिले.

मी मनोमन म्हणालो, लेका तुझा अाणि माझा धर्म एकच!

Labels: , , ,

Monday, March 03, 2008

लासवेगासनगर


पूरा मम पत्नी उक्तवती, आवाम् लासवेगासनगरम् गच्छाम:। अहम् आमेति उक्तवान। किंचीत कालांतरे सा पुन: उक्तवती, "आर्यपुत्र, अहम् वेगासनगरम् गन्तुम् इच्छामि, त्वमपि इच्छसि वा? " आवाभ्याम् वेगासनगरम् गच्छन्ते, इति मया उक्तम्।


सा पॄच्छन् आसीत्, अहम् आम् इति उक्तन् आसीत् ।

गत मासे सा क्रोधेन उक्तवती, भवान यदि भोजनं इच्छसि, तर्हि वेगासनगरे निवासप्रबंध कुर्यात।



भुभुक्षीत: अहं द्युतस्थानस्य आरक्षण क्रीतवान। अत: गत सप्ताहान्ते आवाम वेगासनगरे आस्ताम।

Tuesday, October 23, 2007

डोंगराला अाग लागली पळा पळा पळा ........

अधीक फोटो साठी क्लिक करा. http://picasaweb.google.com/shanshali/CAFire


लहानपणी शाखेत एक खेळ खेळायचो डोंगराला अाग लागली पळा पळा पळा ........
सध्या अाख्खा दक्षीण कॅलीफोर्निया हा खेळ खेळत अाहे. अापल्या मोसमी वारयांप्रमाणे इकडे सांता अाना नावाचे विचित्र उष्ण वारे वाहतात. हे मुख्यत: जमिनीवरुन पॅसिफिक महासागराकडे जातात. ह्याच काळात हवेतील अार्द्रता खुप कमी असते. गेली बारा वर्षे इकडे दुष्काळ असल्याने झाडे-झुडपे वाळलेली अाहे.
माझे घर अाणि अॉफीस व्हायटिंग रॅंच नावाच्या राखीव वनक्षेत्राच्या जवळ अाहे. हे वन सांटियागो कान्यान नावाच्या वनाला जोडलेले अाहे. सांटियागो कान्यान हे सिल्वराडो कान्यान, रोझ कान्यान, लाईमस्टोन कान्यान अश्या वनांना जोडले गेलेले अाहे. हा सर्व डोंगराळ भाग अाहे. (मला इथे राहताना लोणावळे, मळवली अश्या मराठी गावांची अाठवण येते. )


शनिवारी रात्री इकडे सांता अानाचे उष्ण वारे वाहू लागले. पाहता पाहता वेग ताशी ६० ते ७० मैल गेला. निरनिराळ्या कारणांनी दक्षीण कॅलीफोर्नियात १५ ठिकाणी वणवे पेटले. ह्यातील काही अागी मानवनिर्मित किंवा मानवी चूकीने लागल्या. रवीवारी दुपारी सर्वत्र शेकोटी पेटवल्या सारखा वास पसरला. संध्याकाळी माझ्या गॅलरीतून समोरच्या डोंगरावर धूर दिसू लागला अाणि रात्र पडताच जाणवले की संपूर्ण डोंगर ज्वाळांनी वेढला गेला अाहे.

त्यानंतर चालू झाले एक अस्वस्थतेचे पर्व...... केंव्हाही घर सोडून जावे लागेल अशी स्थिती निर्माण झाली. अश्यावेळी काय काय सामान बरोबर घ्यायचे ह्याची यादी केली. पासपोर्ट अाणि इतर महत्त्वाची कागदपत्रे, संगणकाच्या हार्डड्राईव्ह, लॅपटॉप संगणक, पाण्याच्या बाटल्या, काही खाद्य पदार्थ, जुजबी कपडे अश्या गोष्टी बॅगेत भरुन ठेवल्या. ऐनवेळी कुठे जायचे हा प्रश्न होताच. बरयाच ठिकाणी अागी लागल्याने सुमारे ९ लाख लोक विस्थापीत झाले अाहेत. हॉटेलं भरुन गेली अाहेत. शेवटी एका मित्राकडे जायचे ठरले. अाणि अाम्ही अस्वस्थपणे दिवस उजाडण्याची वाट पाहू लागलो.

सोमवारी सकाळी सूर्य खुप उशीरा उगवला. सगळे अाकाश धूराने काळवंडले होते. गॅलरी, जीना, गाडी राख अाणि धुळ ह्यांच्या मिश्रणाने भरुन गेली होती. अाग मात्र अाता दिसत नव्हती, डोंगराच्या दुसरया बाजूला गेली होती. अॉफिसला गेलो, नेहमीपणे काम सुरू होते. दुपारनंतर मात्र गोंधळ सुरू झाला कारण अॉफिस पासून २ मैल अंतरावरील डोंगरावर अाग दिसू लागली. पण अजूनही अाम्हाला घरी जायला सांगीतले नव्हते. सोमवार संध्याकाळ पर्यन्त अॉफिससमोरचा डोंगर संपूर्ण पेटला. पण अाताशा अागीची दिशा बदलली होती. माझ्या घराकडे अाग यायाची शक्यता कमी झाली होती. अाम्ही शांतपणे झोपू शकलो.

अाज सकाळी अॉफिसजवळची अाग मंदावल्याचे जाणवत होते. "अाता झोका नाही " असे अामच्या सुरक्षा अाधिकारयाने जाहिर केले. अाणि त्यानंतर १५ मिनिटात अागीने अापला बेभरवसा दाखवला. वनाचा मोठ्ठा हिस्सा पेटला अाणि अाग समोरच्या रस्त्यापर्यन्त येऊन पोहोचली. अाम्हाला ताबडतोब अॉफीस सोडून जायला सांगीतले.
डोंगराला अाग लागली पळा पळा पळा ........ म्हणत घरी अालो. ही अाग फक्त ३० टक्के नियंत्रणात अाहे. केंव्हाही काहिही होऊ शकते. हवेतील उष्मा खुप वाढला अाहे. श्वासोच्छवास घ्यायला त्रास होत अाहे. गाडीच्या काचेवर राख जमा झाली अाहे. घरात एसी लाउन बसावे लागत अाहे. अॉफीसचे काय होणार अाहे ते माहीत नाही.

अधीक फोटो साठी क्लिक करा. http://picasaweb.google.com/shanshali/CAFire

Labels:

Monday, October 01, 2007

एका हिरकणीचा दुर्दैवी अंत

http://www.cnn.com/2007/US/10/01/phoenix.airport.death/index.html

एका हिरकणीचा दुर्दैवी अंत
हिरकणी.............. रायगडावर राहणारी एक गवळीण. रोज पायथ्याच्या गावात दुध विकायला जाणारी सामान्या स्री. पण एके दिवशी तीने असामान्य
गोष्ट केली. दुध विकून परत येताना तीला उशीर झाला, गडाचे दरवाजे बंद झाले होते, तीने रखवालदाराला विनंती केली "मला अात जाऊ द्या, माझी पोरं ऊपाशी अाहेत, मला त्यांना खायला घालायला पाहिजे, मी पाया पडते, मला गडावर जाऊ दे" रखवालरदार म्हणाले, " महाराजांची सक्त ताकीद अाहे, दिवेलागणीनंतर कोणीही गडावर प्रवेश करू शकणार नाही, तुम्ही अात्ता अात जाऊ शकणार नाही"
हिरकणी रडू लागली, हातापाया पडू लागली पण रखवालरदारांना काहीही फरक पडला नाही. मुलांची काळजी तीला सतावत होती, घरात कोणी नाही, पोरे उपाशी असतील, अश्या विचारांनी अस्वस्थ झाली...........पण तीने हार मानली नाही. तीने गडाचा कडा चढायला सुरवात केली. अशक्यप्राय वाटणारा कडा तीने केवळ मुलांच्या मायेखातर चढला.

अाज फिनीक्स विमानतळावे अश्याच एका एका हिरकणीचा दुर्दैवी अंत झाला. पहा (http://www.cnn.com/2007/US/10/01/phoenix.airport.death/index.html)
कॅरोल गोटबॉम नावाची स्त्री, घरी जायचे विमान सुटले म्हणून विमान कंपनीच्या अाधिकारयांशी वाद घालू लागली. "मी एक त्रस्त अाई अाहे हो, मला लवकर घरी जाऊ द्या असे विनवता विनवता तिचा अावाज चढला" पोलीस अाले, तिला बेड्या घातल्या अाणि कोठडीत टाकले. तीचा टाहो थांबला नाही, कोठडीत टाकल्यानंतरही तिच्या बेड्या काढल्या नाहीत. काही तासांनंतर ती म्रुत अवस्थेत सापडली. प्राथमीक अंदाजानुसार बेड्यांमधून सुटला करून घेताना तिला फास लागला आाणि गेली. तपास चालू अाहे.

हिरकणी सुदैवी होती, त्यावेळी राज्यकर्ते साक्षात शिवाजी महाराज होते, त्यांनी तिचे कौतुक केले, खणा नारळाने अोटी भरली. रायगडावर एक बुरुज बांधला अाणि त्याचे नामकरण केले "हिरकणीचा बुरूज"

कॅरोलचा राज्यकर्ता म्हणजे जॉर्ज बुश....... अगदीच दुर्देवी निघाली कॅरोल !

Sunday, September 30, 2007

भारतीय शेती

शरद पवार यांचा आत्मघातकी सल्ला
सौजन्य- महाराष्ट्र टाईम्स [ Wednesday, September 19, 2007 05:40:25 am]


औद्योगिक शहरी समाजात चलनाचे, तंत्रज्ञानाचे प्रस्थ आणि अवडंबर माजविले जाते. ते जैविक, नैसगिर्क घडामोडी असलेल्या शेतीत आणले गेले. यामुळे शेतीची लय बिघडली. भारतीय ऋषिमुनींनी हजारो वर्षांपूवीर् उपनिषदांत आणि इतर ग्रंथांत कृषीविषयी सत्ये सांगितली आहेत. पाराशर मुनी म्हणतात, जंतुनाम् जीवनम् कृषि:. इतर अनेक संस्कृती वेळोवेळी मिटल्या; परंतु भारतीय संस्कृतीचा प्रवाह अखंडित राहिला तो यामुळेच.

.....

कृषिमंत्री शरद पवार यांनी शेती सोडण्याचा सल्ला दिला आहे. शेती शेतकऱ्याला आणि देशाला तारू शकणार नाही, असे त्यांचे म्हणणे दिसते; परंतु जगातील सर्वात सुसंस्कृत, समृद्ध, शांततामय जीवन जगणारे स्वीडन, हॉलंड, डेन्मार्क इ. 'स्कँडिनेव्हिअन' देश मात्र शेतीप्रधान आहेत.

शेती हा या देशाचा कणा होता. हा कणा मोडण्याचे प्रयत्न ब्रिटिशांनी केले; परंतु जे त्यांना जमले नाही ते हरित क्रांतीने घडविले. हरित क्रांती शेतीप्रधान नव्हती, तर उद्योगप्रधान होती. नॉर्मन बोरलॉग यांच्या चारपट उत्पादन देणाऱ्या संकरित बियाण्यांनी हुरळलेल्यांनी दूरगामी, भीषण परिणामांचा विचार न करता 'हरित क्रांती' ही संकल्पना आणली. शेती ही सर्वस्वी निसर्गाच्या आविष्कारांच्या कार्यपद्धतीवर आणि नात्यावर आधारित आहे, या मूळ तथ्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले गेले. संकरित बियाण्यांबरोबरच पाण्याची गरज अनेक पटीने वाढली, कीटकनाशके, तणनाशकांचा मारा सुरू झाला. यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव, जीवाणू, गांडुळे नष्ट झाली. पाणी वाहून नेणारी हवा खेळविणारी सच्छिदता गेली. जमीन मृत झाली, क्षारपड झाली. शेकडो जातीचे कोट्यवधी जीवाणू, गांडुळे हजारो संयुगे तयार करीत होती. त्यांचे पोषण वनस्पतीला मिळत होते. हवा आणि पाण्यातून विघटित होणाऱ्या प्राणवायूचा पुरवठा मुळांना होत होता. हे थांबले. फलधारणेसाठी परागीभवन महत्त्वाचे आहे. नव्या कृत्रिमतेमुळे बहुतांश परागीभवनासाठी जबाबदार असलेले कीटक नष्ट झाले. धान्य, भाज्या, डाळी, फळे इ.नी आपला स्वाद, कस, गंध गमावले, नि:सत्व बनले. ही घोडचूक टाळता आली नसती काय?

अमेरिकेच्या शेती खात्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे बिटिश सरकारने 'जगातील अन्नाचे कोठार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाईल नदीच्या खोऱ्यात, तेथील जमिनींच्या प्रचंड उत्पादकतेच्या कारणांचा शोध घेतला. नोंदलेल्या निरीक्षणांप्रमाणे तेथील मातीत वर्षातील सहा महिन्यांच्या, गांडुळांच्या कार्यक्षम वाढीच्या काळात, प्रति एकरामागे १२० टन गांडुळखताची भर पडते. उत्पादकतेचे कारण मुख्यत्वे गांडुळांची कार्यपद्धती आहे. पुण्याजवळील पाडेगाव ऊस संशोधन केंदाने केलेल्या १९५७ ते ६० मधील तुलनात्मक अभ्यासात स्पष्ट झाले होते की, रासायनिक खतांपेक्षा गांडुळांचा वापर केलेल्या शेतीमधून ३० टक्के जास्त उत्पादन मिळते; परंतु हे शहाणपण गाडले गेले; कारण याच सुमारास रासायनिक खत कारखान्यांचा उदय होत होता.

हरित क्रांतीनंतर उत्पादनखर्च वाढत राहिला. उत्पन्नाशी त्याचे प्रमाण अधिकाधिक व्यस्त होत गेले. परिसरातील जंगल तोडून विकणे भाग पडू लागले. पुढील काळात जैव-जनुक तंत्रज्ञानाने धुमाकूळ घातला. उद्योगसमूहांनी स्थापलेले ट्रस्ट, त्यांनीच निर्माण केलेल्या तथाकथित बिनसरकारी संस्था (एन. जी. ओ.), सरकारी बँका, शासनाची 'पशुपालन', 'महसूल' अशी खाती यांनी एकत्र येऊन कृत्रिम गर्भधारणेतून निमिर्लेल्या पशूंची, विशिष्ट वनस्पतींच्या लागवडीची सक्ती देशभरात केली. पशूंच्या मूळ जातींच्या सांडांमुळे शुद्धता गमावली जाईल, अशी कारणे देऊन स्थानिक बैलांच्या जातीचे खच्चीकरण करण्याच्या मोहिमा राबविण्यात आल्या. 'मॉनसेटो'सारख्या कंपन्यांनी फलन नहोणारी महागडी बियाणी शेतकऱ्यांच्या माथी मारली.

१९९०पासून अमेरिका आणि तिची सूत्रे हलविणाऱ्या आथिर्क सोतांकरवी जागतिकीकरण आणि उदारीकरणाची एक प्रकारची सक्ती जगभर सुरू झाली. देशातील धोरणे शेतकरी, गरिबांच्या विरोधात गेली. शेतकऱ्यांना सबसिडी देऊ नये, असा मतलबी प्रचार होऊ लागला. अमेरिकेचे उदाहरण देऊन हे राबविण्यात येत असताना, अमेरिकेत मात्र वेगवेगळी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना किमान ५० टक्के ते कमाल १०० टक्के सबसिडी देण्यात येते, हे लपविण्यात आले. बँकांनी काढता पाय घेतल्याने शेतकरी पुन्हा एकदा सावकारांच्या पाशात अडकला. प्रचंड कजेर् काढलेल्या शेतकऱ्यांनी पीक घेणे सुरू करताच दलालांनी भाव पाडले. कजेर् फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी शेती गमावली.

धान्य पिकविणारी विशिष्ट 'पॉकेट्स' देशात तयार केली गेली. 'भुकेसाठी अधिक अन्न' या उद्दिष्टाऐवजी 'बाजारपेठेसाठी अधिक धान्य' हे ध्येय बनले. गोदामे धान्याने भरली; परंतु खरेदी करण्याची क्षमता नसलेले गरीब भुकेने तडफडू लागले. बाजारपेठेची अर्थव्यवस्था यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाला बाजारात उभे करणे जरूरीचे होते. म्हणून शेतकऱ्यांची स्वयंपूर्णता मोडली गेली. उत्पादक आणि उपभोक्ता या दोन्ही भूमिकांची फारकत केली गेली. सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था मोडीत काढल्याने शेतकरी व गरीब अधिकच असहाय झाला.

सन १९७२च्या दुष्काळाने व्यथित झालेल्या विलासराव साळुंखे यांनी मर्म ओळखले. शेतीबाह्य रोजगाराची मलमपट्टी करणाऱ्या रोजगार हमी योजनेपेक्षा शेती फुलवून नंदनवन आणणाऱ्या पाण्याची हमी हवी. त्यांनी, एकरी पाणी न देता माणसी अर्धा एकरसाठी पाणी, अशी 'समन्यायी पाणी वाटपाची' कल्पना मांडली व स्वत: यशस्वीरीत्या राबवून दाखविली. पुरंदरसाख्या फक्त १५ इंच पाऊस पडणाऱ्या दुष्काळी समजल्या जाणाऱ्या तालुक्यात नंदनवन फुलवले. तेथून प्रेरणा घेऊन शेतीला इतर पूरक कामांची जोड देऊन, साध्या दगडांच्या, लाकडांच्या बांधांनी पाणी अडवून अण्णा हजारेंनी ग्रामीण कायाकल्प घडविला. राजेंद सिंहांसारख्यांनी राजस्थानात 'अरवरी' नदीचे पुनरुज्जीवन केले. शहरांकडे होणारी स्थलांतरे या कामांनी रोखली, एवढेच नाही तर उलटी स्थलांतरे सुरू झाली. दुदैर्वाने 'सामाजिक काम करणाऱ्यांनी राजकारणात पडू नये', अशी चुकीची मानसिकता जनतेत रुजली असल्याने, या विधायक कार्याचे चळवळीत व पर्यायाने राजकीय प्रतिनिधित्वात, सत्तेत रूपांतर झाले नाही. तसे झाले तर हीच कामे 'धोरण' बनली असती.

शेतीसंबंधी संकल्पना, उदा. 'पाणलोट क्षेत्र विकास' राबवताना जमीन, पाणी, वनस्पती, प्राणी इतर नैसगिर्क आविष्कार आणि माणूस यांचा एकत्रित विचार व्हायला पाहिजे; परंतु तसे न होता सर्व गोष्टी तंत्रज्ञानाच्या भोवती फिरत राहतात. विशेषज्ञ आणि अभियंते यांची तुकड्या-तुकड्यात मर्यादित विचार करण्याची सवय सम्यक आकलनाच्या आड येते. औद्योगिक शहरी समाजात चलनाचे, तंत्रज्ञानाचे प्रस्थ आणि अवडंबर माजविले जाते. ते जैविक, नैसगिर्क घडामोडी असलेल्या शेतीत आणले गेले. यामुळे शेतीची लय बिघडली. महात्मा गांधींचा आदर्श मानणाऱ्या मासानोबु फुकुओका या जपानच्या शेती खात्यातील कीटकनाशकतज्ज्ञाने असत्य जीवनाचा उबग येऊन नोकरी सोडली. निसर्गाच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास करून त्यात किमान हस्तक्षेप करणारी नैसगिर्क शेतीपद्धती त्यांनी विकसित केली. जपानमधील पिकांचे विक्रमी उत्पादन त्यांनी सातत्याने त्यांच्या हयातीत सुमारे सहा दशके घेतले. अमेरिकेतही त्यांचा मार्ग शेतकरी अनुसरत आहेत.

भारतीय ऋषिमुनींनी हजारो वर्षांपूवीर् उपनिषदांत आणि इतर ग्रंथांत कृषीविषयी सत्ये सांगितली आहेत. पाराशर मुनी म्हणतात, ''जंतुनाम् जीवनम् कृषि:'' हेच कारण आहे की, इतर अनेक संस्कृती वेळोवेळी मिटल्या; परंतु भारतीय संस्कृतीचा प्रवाह अखंडित राहिला. आजऱ्याचे समपिर्त वृत्तीचे शेतकरी मोहन देशपांडे यांनी हा प्रवाह खळाळत राहावा यासाठी ऋषींच्या वचनांचा अभ्यास करून मृत जमिनीला पुनरुज्जीवित करण्याची सोपी पद्धती दीर्घ अभ्यास व प्रत्यक्ष शेतीतील प्रयोगांतून सिद्ध केली. या नैसगिर्क शेतीतून त्यांनी शेकडो शेतकऱ्यांच्या शेतीवर आधुनिक रासायनिक शेतीपेक्षा जास्त कसदार उत्पादन घेत आहेत.

आज कार्बनी ऊर्जासोतांचा वापर, बांधकाम, नगदी पिके, प्रचंड वस्तुनिमिर्ती यामुळे जंगलाचा, परिसंस्थांचा प्रचंड नाश होत आहे. ग्लोबल वॉमिर्ंग, जैव विविधतेचा प्रत्यही होणारा नाश यामुळे जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहे. वातावरण बदलाचा अभ्यास करणारा सुमारे १५०० शास्त्रज्ञांचा समूह परोपरीने धोक्याचा इशारा देत आहे. अशा वेळी या विनाशाकडे होणारी वाटचाल थांबविण्याऐवजी ती गतिमान करणारे 'सेझ' आणि 'कॉपोर्रेट' शेतीसारखे विनाशकारी प्रकल्प हाती घेऊन शेती सोडण्याच्या सल्ले देणे हे आत्मघातकी आहे. भारतीय संस्कृतीचा प्रवाह खंडित करण्याचे, तो गाडण्याचे महापाप राजकारण्यांनी करू नये.

Friday, September 14, 2007

Article on India Agriculture