Thursday, July 21, 2016

बॉन्साय

अनेक वर्षांपूर्वीं मला बॉन्साय बनण्याचा छंद जडला होता. जकरंड आणि बूचाच्या झाडांचे मी दौलदार बटू वृक्ष बनवले होते. मी त्यांना रोज पाणी द्यायचो, मुळे आणि फांद्या कापायचो. त्यांचं कुंड्यांमध्ये छोटेखानी दगड ठेवून त्यावर हिरवे शेवाळे किंवा मॉस वाढवायचो. पुण्यातील बोन्सॉय च्या प्रदर्शनात बक्षीस मिळवण्याची ईर्ष्या होती माझी. पण मी त्यावेळी आनंदी नव्हतो. जे करायची इच्छा होती ते जमत नव्हते, मिळत नव्हते. लहानपणी शिकलेली नारायणराव टिळकांची कविता सारखी आळवत होतो. "हे विश्व सारे विहारास माझ्या पुरेसे ना होईल शंका नको " आपण खूप काही करू शकतो पण कोणत्या तरी अदृश्य बंधनात अडकलो आहोत असा काहीतरी विचार सतत यायचा. अश्या गोंधळलेल्या विचाराच्या जळमटात अडकलेलो असताना एकदा त्या बोन्साय कडे लक्ष्य गेले आणि त्यांच्या बद्दल कवण वाटून गेली. एक अर्थाने त्यांची आणि माझी अवस्था फार वेगळी नाही असे जाणवले. घरासमोर दोन खड्डे खणले , कुंड्या फोडल्या आणि तो जकरंड आणि बूच खुल्या आकाशात आणि सर्वांना समाविष्ट करणाऱ्या धरणी मध्ये लावले. आणि मग कधीतरी पुढील कविता लिहिली.
आज ती झाडे सुमारे चाळीस फूट उंच झाली आहेत.
वसंत ऋतू मध्ये ती झाडे इतकी बहरतात की सगळा रस्ता पांढरा आणि जांभळा होतो. बुचाच्या फुलांचा घमघमाट पसरतो. आणि हो...कर्मधर्मसंयोगानी .. मीही आज आनंदी आहे.

0 Comments:

Post a Comment

<< Home